एका झाडाचे मनोगत 
Eka Jhadache Manogat

               मी एक झाड बोलतोय. मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सद्ध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात तुम्ही मला विसरला आहात. मी तुम्हाला आज माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

                  माझ्यामुळेच तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन ज्याच्या शिवाय मानव मिनिटापेक्षा जास्त जगू हि शकत नाही. मी जर ऑक्सिजन निर्माण नाही केला तर तुम्ही श्वास कसा घ्याल, निसर्गाचा ऱ्हास करून बनवलेल्या घरात कसे राहाल? जंगले तोडून बांधलेल्या रस्त्यांवर प्रवास कसा कराल? जर झाडे नसतील तर या पृथ्वीवरचे जीवनाचं नष्ट होईल. हे सारे समजायला किती सोपे आहे. पण तरीही तुम्ही का वृक्षतोड करता? का वणवे पेटवता?

                  माझ्या अंगाखांद्यावर पशू पक्षी खेळतात. किती पक्षी तर आपली घरटी माझ्या फांद्यांवर मांडतात. तुम्ही त्यांचे घर तोडून टाकता आणि आपले घर बांधता आणि मग एखादा बिबट्या, हत्ती घरात, शेतात शिरला तर, आरडाओरड करता? त्याला तुम्ही पळवून पळवून मरून टाकता. तुम्ही पशू पक्षांचे घर तोडता, जाळता मग त्यांनी तुम्हाला मारले तर चालेल का?

                   सहलीला जाताना एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून वन भोजन करणे कोणाला आवडत नाही . पण रस्ते रुंदीकरणासाठी तुम्ही अशीच झाडे तोडत राहिलात तर असे अनुभव तुम्ही कसे घेऊ शकाल. वडाच्या पारंब्याना लटकणे, चोरून आंबे पाडणे, मोठ्या झाडाच्या फांदीला झूला झूलने; या साऱ्या आठवणीनी तुमचे बालपण सजले होते. पण ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे, पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत आणि मग तुम्ही तक्रार करता कि आमची मुले दिवस रात्र विडिओ गेम्स खेळत बसतात.

                 तुमच्या सारखे आम्ही सुद्धा जिवंत आहोत, आम्हाला हि भावना आहेत, आम्हाला हि वेदना होतात. तुमच्या मुलांना, प्रियजनांना थोडेसे खरचटले की तुमच्या मनाची घालमेल होते. पण झाडाच्या फांद्या तोडताना, फळांसाठी दगड मारताना, करवतीने, कुऱ्हाडीने वृक्षांना कापताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? डोळ्यात अश्रू नाही पण मनात एक साधा विचार हि येत नाही, एवढे अमानुष कसे झालात तुम्ही?

                   झाडाझुडपांमुळे जमिनीची धूप कमी होते. झाडांची मुळे माती धरून ठेवतात, याने जमिनीचा पोत टिकून राहतो. यामुळे कमीत कमी कृत्रिम, रासायनिक खतांच्या मदतीने चांगले पीक घेता येते. जर चांगली पिके आली तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही, त्याला आत्महत्या करावी लागणार नाही.

                 आदिवासी, गावातील गरीब लोक जंगलातून फळे, फुले (रानमेवा) आणून विकतात. त्यांच्यावर त्यांचे पोट भरते. झाडे तोडून,वणवे लावून तुम्ही त्यांच्या पोटावर पाय ठेवत आहात. तुम्ही जंगलात वणवे लावता, हजारो छोटे मोठे प्राणी, पक्षी मारले जातात, त्यांना स्थलांतर करावे लागते. जर तुमचे घर कोणी विनाकारण पेटवून दिले तर तुम्हाला कसे वाटेल? या सर्वामुळे नकळत तुम्ही मानवी जीवन चक्र प्रभावित करत आहेत. तुम्ही स्वतःच्या हातांनी आपला विनाश लिहत आहात.

                 अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही खूप झाडे तोडली आहेत, पर्यावरणाचा खूप ऱ्हास केला आहे. अजूनही तुम्ही केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. आणखी एखादं दशक असेच चालू राहिले तर काहीच करता येणार नाही. आज जसे आपण बाटलीतून पाणी पितो तसे भविष्यात बाटलीतून श्वास घ्यावा लागेल. आपल्या नंतरची पिढी राजनीती आणि धर्मासाठी लढता, पाणी आणि ऑक्सिजन साठी एकमेकांचा जीव घेईल. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला हाच वारसा द्यायचा आहे का?

                 मी कोणामध्येही भेदभाव करत नाही. माझ्यासाठी पशू, पक्षी, मानव सारे एक सारखे आहेत. मी जात, धर्म, रंग असा भेदभाव करत नाही, मला सगळेच प्रिय आहेत. तुम्ही पण असे सगळे भेदभाव विसरून एकत्र या आणि या सुंदर पर्यावरणाला वाचावा. नाहीतर उद्या मनुष्यच नसतील तर तुम्ही जात, धर्म, रंग, राज्य, भाषा, देश यांचे काय कराल. वृक्ष सुद्धा तुमच्या सारखेच सजीव आहेत, त्यांचे संगोपन करा, काळजी घ्या.

                  माझे हे मनोगत ऐका आणि प्रत्येकानी एक नाही चार चार झाडे लावा. वाढदिवसात, लग्नात इतर भेटवस्तू देण्याऐवजी झाडाचे रोपटे भेट म्हणून द्या. मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर झाडे लावा. फक्त आपल्या जमिनीवरील नाही तर दुसऱ्याच्या झाडांनाही पाणी घाला. पशूंपासून त्यांची रक्षा करा. वणवा लावून देऊ नका. तुम्ही निसर्गाचा आदर करा,निसर्ग तुमचे संगोपन करेल. निसर्ग खूप बलाढ्य आहे, तो खूप सहनशील आहे, पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका, हीच विनंती. सर्वात शेवटी मी एकच मंत्र देईल, "झाडे लावा झाडे जगवा".