शिक्षक दिन 

Shikshak Din

                डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णनयांनी एके  ठिकाणी म्हटले आहे - "ज्या देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.

               वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अत्युच्च स्थान दिले आहे. गुरुला देवाच्या स्थानी मानले गेले आहे. जो देतो तो देव. गुरुंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची  अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची गुरु कडून असते. जे जे आपणासि ठावे |  ते  ते दुसर्यांस सांगावे |  शहाणे करून सोडावे सकलजन | अशी वृत्ती शिक्षकाची हवी. त्यामुळे मुळात शिक्षकाकडे माहितीचा खजिना असणे आवश्यक आहे. निदान ही माहिती कोठून मिळवायची याचे मार्गदर्शन तरी आजच्या काळात शिक्षकाला करता आले पाहिजे. आज चहुबाजूंनी माहितीचा प्रचंड स्फोट होत आहे. नवा इतिहास घडत आहे. भौगोलिक बदल होत आहेत. वैज्ञानिक शोध लागत आहेत. थोडक्यात सामाजिक ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक असे परिवर्तन जागतिक पातळीवरच होत आहे. त्याची माहिती शिक्षकाने करून घेणे गरजेचे आहे. पुर्वीचा विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी यात महदंतर आहे. पूर्वी गावात शिक्षक जे सांगेल तेच खरे ज्ञान , अशी परिस्थिती होती. कोर्या करकरीत  मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम आई, वडील, शिक्षक करीत असत. आज विद्यार्थ्याच्या मनाची पाटी कोरी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, चित्रपट, नाटके, जाहिराती, मासिके, संगणक, मोबाइल आणि भोवतालचा परिसर यातून विद्यार्थी शिक्षकांच्या आधीच प्रचंड माहिती मिळवतो. त्यातील कोणती माहिती विद्यार्थ्याच्या मनःपटलावर पक्की करायची व कोणती काढून टाकायची याचे भान शिक्षकाने  ठेवले पाहिजे. त्या दृष्टीने शिक्षकाचे कार्य आज खरोखरच अवघड बनत चालले आहे. एखादी पूर्णत: नवीन निर्मिती करणे जितके सोपे; तितके जुन्याची मोडतोड करून चांगले काही बनवणे  अवघड असते. म्हणून विद्यार्थ्याला माहीत नव्हते, ते सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्याच्याजवळील माहितीच्या साठ्याचा त्याने कसा उपयोग करून घ्यावा यचे मार्गदर्शन करून; त्याला योग्य मार्गाने  आचरण करयला लावणे; म्हणजे शिक्षण हे आज लक्षात घेणे गरजेचे आहे .एक निकृष्ट शिक्षक 'सांगत जातो.' सामान्य शिक्षक 'स्पष्टिकरण करतो.' चांगला शिक्षक 'प्रात्यक्षिक' करतो. तर खरा शिक्षक 'प्रेरणा' देतो.  आणि म्हणून विद्यार्थ्याला प्रेरणा देण्यासाठी शिक्षकाने स्वतः उत्साहाने सतत शिकत राहिले पाहिजे शिक्षकाने विद्यार्थ्याला स्वतःला ओळखयला शिकवले पाहिजे. त्याच्यातील त्रुटी, त्याच्या क्षमता त्याला दाखवून विकासाचा मार्ग दाखवण्याचे काम शिक्षकांनी करावे. आज शिक्षक केवळ वर्गात शिकवणारी, अभ्यासक्रम  पूर्ण करणारी व्यक्ती न रहाता विद्यार्थ्यांच्या व्यकिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला मदत करणारी जबाबदार व्यक्ती बनायला हवी. असा विद्यार्थी घडवण्याची जबबदारी पार पाडण्यासाठी प्रथम शिक्षकाने स्वतःच स्वतःला घडवावे म्हणजे स्वतः शिक्षकाने चारित्र्यवान असावे.तरच तो चारित्र्यवान विद्यार्थी घडवू शकेल.

              शिक्षक म्हटले की मला आठवतात धनानंदाच्या जुलमी  राजसत्तेला उलथवून टाकणारे आर्य चाणक्य. शिक्षक म्हटले की मला आठवतात, देशप्रेमाने भारलेले; देशस्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेले लोकमान्य  टिळक आणि आगरकर. शिक्षक म्हटले की मला आठवतात, रंजल्या गांजल्या समाजाला उन्नती अवस्थेला नेण्यासाठी झटणारे तुकाराम , ज्ञानेश्वर, एकनाथ आणि रामदासादि संत. शिक्षक म्हटले की मला आठवतात आदिवासींच्या शिक्षणासाठी झटणार्या अनुताई वाघ. आज समाजाला अशा शिक्षकांची  खरोखर गरज आहे. भ्रष्टाचार, व्यसनाधिनता, अंधश्रद्धा, दांभिकपणा, अन्याय, अत्याचार, या सार्वांची पाळेमुळे उखडून टाकण्यास समर्थपणे उभे रहाणारे, समाजाला अगदी हीन अवस्थेप्रत नेण्यास कारणीभूत ठरलेले नेते, अभिनेते व तथाकथित राजकारणी, सनदी अधिकारी यांना निर्भयपणे धडा शिकावण्यास सज्ज असलेले,  दिशाहीन बनलेल्या विद्यार्थांच्या पाठीवर प्रेमळ हात फिरवून त्यांना मार्ग दाखविणारे आणि त्यांच्यावरिल अन्यायाला विरोध करण्यास त्यांना सहकर्याचा हात देणारे, असे शिक्षक आज मी शोधते आहे. पण क्वचित कुठे असे काजवे मिणमिणताना दिसतात. बाकी सारे पैशाच्या मागे लागलेले शिक्षक व्यावसायिकच नजरेला पडताहेत. या सर्व मिणमिणत्या काजव्यांनी एकत्र येऊन समाजाची घडी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न करावा आणि आजचा शिक्षकदिन चिंतन दिन म्हणून साजरा करून समाजात आपले स्थान सर्वात उच्च बनवण्यासाठी कार्यरत व्हावे; हीच राधाकृष्णन यांना आदरांजली ठरेल.