माझा आवड़ता संत 
My Favorite Saint


या परंपरेतील संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी होत. त्यांचा जन्म १६०८ साली देहू येथे झाला.  संत तुकारामांचे घराणे हे त्या काळातील एक प्रतिष्ठित घराणे होते. त्यांचे शिक्षण त्या काळातील प्रतिष्ठित घराण्यांतील व्यक्तींप्रमाणे झाले.

संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले.

त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. असंख्य माणसे देशोधडीला लागली. कित्येक मृत्युमुखी पडली. तुकाराम महाराजांवर नातेवाइकांचेही  मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले. त्या भीषण दुष्काळाने माणसांची केलेली दैना पाहून तुकाराम महाराजांच्या मनात विरक्ती दाटून आली. लहानपणापासून अध्यात्मविदयेचे संस्कार जागृत झाले. त्यांचे मन अध्यात्मचिंतनात गढू लागले. ते देहूजवळच्या भामनाथगडावर जाऊन अध्यात्मचिंतन करू लागले. 

गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव गाथा वगैरे थोर ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. या दरम्यानच्या काळात संत तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश झाला. संत नामदेव पांडुरंगासमवेत त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी त्यांना कवित्व करायला सांगितले आणि अलौकिक प्रतिभेतून स्फुरलेली त्यांची अमृतवाणी सिद्ध झाली.

संत तुकाराम महाराजांच्या  काव्याकडे सामान्य माणसापासून ते त्या काळातील प्रतिष्ठित लोकांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित झाले. गावागावांत त्यांची कीर्ती पसरली. संत तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून काहीजणांना त्यांचा मत्सर वाटू लागला. हे मत्सरी लोक त्यांचा नाना प्रकारे छळ करू लागले. त्यांच्या अभंगांच्या वह्या  त्या दुष्ट लोकांनी इंद्रायणी नदीत बुडवायला लावल्या. परंतु विठ्ठलकृपेने त्या वह्या  तरंगून वर आल्या, ही कथा सगळ्यांना ठाऊकच आहे. यामुळे लोकांच्या मनात तुकाराम महाराजांविषयी अपार भक्तिभावच निर्माण झाला.

संत तुकाराम महाराजांनी धर्मरक्षण हेच जीवितकार्य मानले होते. त्यांनी जातपात, उच्चनीच हे भेद नाकारले. संत तुकाराम महाराजांच्या कार्याच्या रूपाने भागवत संप्रदायाने कळसच गाठला. त्यांचे काव्य सुभाषितांसारख्या वचनांनी नटलेले आहे


जे का रंजले गांजले। त्यांसि म्हणे जो आपुले।

तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।


अशा हजारो प्रासादिक अभंगांतून आपले दिव्य तत्त्वज्ञान संत तुकाराम महाराजांनी जनतेसमोर मांडले आहे. जनसामान्यांच्या जिभेवर हे काव्य विराजमान झाले आहे. 'संत तुकारामांची गाथा' ही मराठी भाषेचे एक अलौकिक भूषण बनले आहे.