आई संपावर गेली तर 
Aai Sampavar Geli Tar

                 कुटुंबासाठी जेवण करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, ही सगळी काम आईचीच आहेत, नाही का? त्यात मोठं असे काय करते ती. हि तिची जबाबदारीच आहे ना. मी नव्हतं सांगितलं तिला जन्म द्यायला, हि आपली नेहमीची कारणे, नाही का?.

                  आपण तिच्या कामाची, मेहनतीची, काळजीची, प्रेमाची कधीही प्रशंसा तर सोडा साधी दखल हि घेत नाही. जर एखादी गोष्ट आपल्याला खूप प्रमाणात मिळाली, कमी मेहनतीमध्ये मिळाली, तर आपण तिची किंमत करत नाही. मग ते अन्न असू देत, पैसा असू दे, किंवा आईचे प्रेम. एकदा डोळे बंद करून कल्पना करा की आई जर खरोखरच संपावर गेली तर, जर तिने घरचे काम करणे सोडले, जेवण बनवणे थांबवले, आणि जर तिचे प्रेम गोठले, तर काय होईल? जर आई संपावर गेली तर आपल्या आयुष्यात काय बदल होतील, ते सुखद असतील की दुःखद?

                  सगळ्यात पहिली गोष्ट जी डोळ्यासमोर येते ती म्हणजे आईची कटकट थांबेल. हे आण, ते दे, इथूनच उठ, तिथे बस, हे घालू नको, वेळेत घरी ये, हे सगळे थांबेल. रात्री-बेरात्री मित्रांसोबत टवाळक्या करताना आईचा सारखा सारखा फोन येणार नाही; विचार करूनच किती मस्त वाटते.

                  सकाळी ती उठवायला येणार नाही, ब्रश करायला लावणार नाही. आपण स्वताच स्वतःसाठी पाणी गरम करून वेळेवर आंघोळ करून नाश्ता बनवू. टिफिन भरू, दप्तरामध्ये सगळी वह्या-पुस्तके व्यवस्थित भरून स्वतःच वेळेमध्ये स्कूलबस साठी जाऊ.

                    शाळेत शिक्षक-पालक मीटिंगसाठी बाबा वेळ काढून येतीलच, आईची गरज काय आहे. संध्याकाळी घरी आल्यावर आपली भांडी घासावी लागतील, दुसऱ्या दिवशीचे कपडे धुवून, इस्त्री करून घ्यावे लागतील. कपडे वॉशिंग मशीन मधून काढून सुकत घालावे लागतील, सुकून झाल्यावर ते घडी घालून ठेवावे लागतील. संध्याकाळची भूक लागल्यावर इडली, डोसा, थालीपीठाच्या जागी रोज झटपट होणारी मॅग्गी खावी लागणार.

                   कधी सर्दी खोकला झाला तर स्वतःच्याच हाताने विक्स लावावे लागेल, स्वतः दवाखान्यात जावे लागेल. नेहमी लागणार्या गोळ्या, फर्स्ट एड किट, आयुर्वेदिक औषधे आणून ठेवावी लागतील.

                 आणखी खूप काही आहे; हे तर आई करते त्याच्या % सुद्धा ही नाही. जर आई खरोखरच संपावर गेली आयुष्य थांबेल, कुठलेही काम वेळेत होणार नाही. आपल्याला आईविना जगण्याची सवयच नसते. तिच्या शिवाय आयुष्य कसे चालते हे आपल्याला माहितीच नसते. ज्या मुलांना आई नसते त्यांना विचारा आई नसणं काय असत. आई नसते तेव्हा बाबांना आई व्हावं लागत पण आयुष्यात कुठल्या ना कुठल्या रूपात आई असणं गरजेचं असतंच.

                  आपण, आजकालची पिढी आईवडलांना, त्यांच्या प्रेमाला, काळजीला गृहीत धरतो; कधीकधी तर आपल्याला त्याचा त्रासही होतो. त्यांचा कधी कधी होणारा रागवा, चिडचिड आपल्या लक्षात राहते पण त्यामागची काळजी कळत नाही. आई खरोखरच संपावर गेली पाहिजे नाहीतर आपल्याला तिची किंमत कधीच करणार नाही.