होळी सण
Holi Festival

                होळी हा एक हिंदू सण आहे, तो पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, वाईटावर चांगलेपणाचा विजय. वसंत ऋतू च्या स्वागतासाठी सुद्धा होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी सगळे वातावरण खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असते. होळीच्या दिवशी लोक एकत्र येतात, आपले रुसवे फुगवे विसरून जातात.

                  होळी हा दिवसांचा सण आहे, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या सायंकाळी याची सुरवात होते. इंग्रजी पंचांगानुसार होळी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येऊ शकते. या वर्षी, साल २०१८ मध्ये होळी मार्चला आहे. होळीच्या पहिल्या दिवसाला छोटी होळी म्हणतात, या दिवशी लोक होलिका दहन करतात, पूजा करतात.

                 खूप वर्षां पूर्वी गावचे सगळे लोक वादविवाद विसरून होलिका दहन साठी एकत्र येत असत. त्या साठी लागणारी लाकडं, गवात मिळून जमा करत असत. सर्व स्त्रिया एकत्र नैवद्य बनवत, पूजेची तैयारी करत असत. होळी म्हणजे फक्त एक सण नसून समाजाचा एक महत्वाचा घटक सुद्धा होता, तो लोकांना एकत्र आणायचा. पण आजकाल, लोक एकत्र येत नाहीत. जो तो आपल्या अंगणात स्वतःची होळी बनवतो. त्यामुळे होळीची पहिल्या सारखी मजा येत नाही आणि होळीची खरी परंपरा, संदेश नवीन पिढीकडे पोहचतच नाही.

                होळीच्या दुसऱ्या दिवसाला रंग पंचमी बोलतात, कोणी या दिवसाला रंगावली, सुद्धा म्हणतात. रंगपंचमी खर तर होलिकादहनाच्या राखेपासून खेळत असत, पण आजकाल आपण कृत्रिम, रासायनिक रंगच वापरतो. पुरातन काळात होळीचा रंग हा गुलाल, हळद, कुंकू, चंदन पूड आणि सुवासिक वनस्पतींपासून बनवत असत. आजकाल आपण रंगबिरंगी पावडर, पाण्याचे फुगे आणि पिचकारी सोबत रंगपंचमी खेळतो. या दिवशी कोणीही कुणालाही रंगात भिजवून टाकते, आणि लोक सुद्धा हसत हसत रंग खेळतात.

                होळीच्या सणामागे आजच्या वेळेनुरूप अशी शिकवण आहे. होळीच्या दिवशी होलिका राक्षसणीचा वध झाला, हिरण्यकशिपू चा बेत फसला, चांगल्याचा वाईटावर विजय झाला. आजच्या या जगात जिथे गुन्हे, चोऱ्या, भ्रष्टाचार वनव्यासारखा पसरतोय तिथे होळी चा संदेश आपणास आशा देऊन जातो. सरतेशेवटी सत्यच जिंकणार.

                होळी सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सुद्धा साजरा केला जातो. झाडे, झुडपे असह्य उन्हाळा आणि हिवाळा सोसून वसंताची वाट पाहत असतात. वसंतामध्ये नवी पालवी फुटते, त्यांची वाढ होते, रंग बेरंगी फुले उमलतात, वातावरण खूप अल्हद असते. माणसाचे आयुष्य हि असेच असते, कधी सुख तरी कधी दुःख, कधी आराम तर कधी मेहनत. होळी आपल्याला शिकवते कि अंधाऱ्या समयी टिकून राहायचे असते आणि सकाळच्या सूर्य किरणांची वाट पाहायची असते. प्रत्येक रात्री नंतर दिवस येतोच. होळी पुरातन काळापासून साजरी केली जाते पण होळीचा संदेश आजही तितकाच संबंधित आहे. होळीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो, होळी कुठल्या एक धर्माची नाही तर ती सर्व मानवजातीची आहे.

                 होळीच्या तश्या खूप कथा आहेत, पण सगळ्यात जास्त प्रचलित ती म्हणजे भक्त प्रल्हाद ची. हिरण्यकशिपू नावाचा एक राजा होता, त्याला एक मुलगा होता प्रल्हाद. हिरण्यकशिपूला देव आवडत नसत आणि प्रल्हाद हा भगवान विष्णू चा खूप मोठा भक्त होता. दिवस रात्र देवाचे नाव जपायचा. हिरण्यकशिपू प्रल्हादच्या भक्तीने, जपाने संतापात असे, म्हणून त्याने स्वतःच्या मुलाला जीवे मारण्याचे ठरवले. त्याची होलिका नावाची असुर बहीण होती. तिच्या कडे एक जादुई वस्त्र होते, जे तिला भयानक आगीपासून वाचवू शकत होते.

                 होलिकाने भक्त प्रल्हाद ला आगीत जाळून मारण्याचा कट केला. ती त्याला घेऊन धगधगत्या चिते वर बसली, हिरण्यकशिपूला वाटले कि आता प्रल्हाद जळून जाईल आणि होलिका सुखरूप आगीतून बाहेर येईल. पण भगवान विष्णूच्या कृपेने उलटे झाले, होलिका आगी मध्ये जाळून गेली आणि भक्त प्रल्हाद आगीतून सुखरूप बाहेर आला.

                    याच विजयाच्या स्मरणार्थ होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होळी म्हणजेच चांगल्याचा वाईटावर विजयाचे प्रतीक होय, हा या कथेचा सारांश आहे.

होळी बद्दलचे विवाद

                 राजनैतिक किंवा इतर कारणांसाठी काही लोक होळी ला धार्मिक विवादात पाडतात. तसेच, रंग पंचमी साठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नुकसान होते, असाही विवाद होळी सणाच्या दरम्यान उठतो. होळी, रंग पंचमी साठी वापणारे कृत्रिम, रासायनिक रंग विषारी असतात. त्यामुळे तवतेचे रोग होऊ शकतात, डोळ्यांना इजा होऊ शकते.

                  होळी आता भारताची सीमा पार करून विदेशातही पोहचली आहे. अमेरिका, कॅनडा सारख्या देशामध्ये भारतीय आणि गोरे लोक रंगांसोबत होळी साजरी करतात. ते लोक मोठे म्युझिक फेस्टिवल ठेवतात त्यामध्ये कदाचित मद्य प्रसशं सुद्धा केले जाते, त्यांची होळी म्हणजे एक पार्टी असते. हे खूप चुकीचे आहे. होळीचा खरा अर्थ जाणणे तर दूर राहिले, हे लोक तर होळी सणाचा सरासर अपमान करत आहेत. होळी सण काय आहे, त्याच्या मागची कथा काय, या सणाचा अर्थ काय, महत्व काय हे पहिले त्यांनी जाणून घेतले पाहिजे.