निसर्ग माझा मित्र 
Nature is my Friend

                  सृजनकर्त्याने पहिल्यांदा निसर्ग बनवला; वातावरण, पाणी, जीवाणू , झाडे, झुडपे, प्राणी, पक्षी आणि मग मानवाचा जन्म आणि विकास झाला. या निसर्गाशिवाय मानवाचे अस्तित्व असूच शकत नाही, आणि हे विधान विज्ञान सुद्धा मानते. आपल्या आकाशगंगेमध्ये लाखो तारे, ग्रह आहेत काही पृथ्वीपेक्षा मोठे तर काही छोटे. पण आपल्या निरीक्षण योग्य अवकाशात मात्र एकाच ठिकाणी जीवन सापडते ती जागा म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवरच्या जीवनाचा आरंभ कसा झाला? का झाला? कशामुळे झाला? असे पृथ्वीवर काय वेगळे आहे की या ताऱ्यांच्या, ग्रहांच्या गर्दीमध्ये फक्त इथेच जीवन दिसते, फुलते आणि बहरते.

                पृथ्वीवर जीवन बहरण्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे इथले वातावरण आणि निसर्ग. या वातावरणाशीवाय, निसर्गाशिवाय कुठल्याही ग्रहावरती जीवन बहरू शकत नाही. या सौरमंडलात आपण अशा अमूल्य ठिकाणी राहत आहोत, आपलं पूर्ण अस्तित्वच या निसर्गाने मांडले आहे.

                जेव्हा एखादा नवीन ग्रह बनतो तो लाव्ह्याचा एक जळता गोळा मात्र असतो, हा गोळा अवकाशात लाखो वर्ष फिरत राहतो. तो हळूहळू थंड व्हायला सुरुवात होते पण या प्रक्रियेत सुद्धा लाखो वर्षं निघून जातात.

                 अशा लाखो वर्षांच्या मेहनतीनंतर ग्रह जेव्हा पुरेसा थंड होतो तेव्हा जीवनचक्राचे पहिले पाऊल ग्रहावरती पडते, ते म्हणजे वातावरण बनण्याची सुरुवात. कुठलही ग्रहावरती वातावरण बनण्यासाठी कार्बोन डाय ऑक्साइड सारख्या ग्रीन हाऊस वायूंची गरज असते. तिथल्या जमिनीवरच्या रासायनिक प्रक्रियेतून, ज्वालामुखी मधुन हे ग्रीनहाउस वायू बाहेर पडतात आणि हळूहळू वातावरण बनायला मदत करतात.

                लाखो वर्षांच्या या प्रक्रियेनंतर तो ग्रह संतुलित होतो, जर तिथे पाण्याचे अस्तित्व निर्माण झाले तर जीवनाची दुसरे पाऊल उचलले जाते. जिवाणूंच्या रूपामध्ये जीवनचक्र आपले काम चालू करते. परत एकदा लाखो वर्षांच्या उत्क्रांती नंतर छोटे छोटे प्राणी, पक्षी, झाडेझुडपे, सजीव रूप घेऊ लागतात. हळूहळू त्या ग्रहावरती निसर्ग आपले अस्तित्व प्रस्थपित करायला सुरुवात करतो आणि मग हा निसर्ग प्राणी, पक्षी, झाडे, झुडपे, कीटक वाढवतो. आणि मग तिथून जीवनचक्राचा पुढचा लाखो वर्षांचा प्रवास सुरू होतो.

                 पृथ्वीवरच्या सजीवांचा इतिहास असाच आहे, करोडो वर्षांच्या अश्या मेहनतीनंतर पृथ्वीवर जीवन अवतरले आणि फुलले. देव म्हणा किंवा बिग बँग, निसर्ग हा मानवाला दिलेला सगळ्यात मोठा उपाहार आहे. या निसर्गाने आपल्याला फक्त जन्म दिला नाही तर आपले संगोपनही केले आहे. आपल्या उत्क्रांतीमध्ये या निसर्गाचा खूप मोठा वाटा आहे. मानवाच्या आणि इतर सजीवांच्या उत्क्रांतीसाठी लागलेले अन्न, पाणी, निवारा याच निसर्गाने दिला.

                 निसर्ग आपल्याला फळे, फुले, भाज्या, धान्य देतो; पिण्यासाठी, साफसफाईसाठी पाणी देतो, घर बांधण्यासाठी लाकूड देतो या निसर्गाशिवाय मनुष्य जीवनाची सुरुवात ही करू शकला नसता. या निसर्गाच्या अंगाखांद्यावर मनुष्य प्रगत होऊ लागला त्याने हत्यारे बनवली, आग पेटवली, चाकाचा शोध लावला आणि या शोधाने मानवाचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. या सर्वासाठी लागणारी सामग्री आणि कल्पना मनुष्याला कुठून भेटली? या निसर्गाकडूनच.

                  नवीन बनवलेल्या दगडांच्या हत्याराने तो शिकार करू लागला, आगीच्या साहाय्याने तो ती शिकार शिजवून खायला शिकला. मनुष्याचे पोषण होऊ लागले, पुढे चाकाच्या साहाय्याने मनुष्य विविध ठिकाणी वेगाने पोचू शकला. मानवाच्या प्रगतीमधील या तीन घटना सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत आणि हा उपहार आपल्याला या निसर्गाने दिला आहे.

                हजारो वर्षांच्या प्रगतीनंतर मनुष्यजीवन सुधारू लागले. मनुष्य इमारती बांधू लागला, कपडे शिवून घालू लागला, औषधांनी रोग दूर ठेवले, माणसाचे आयुष्य वाढले. अल्पवयीन मृत्यू कमी झाल्याने जीवनकाळ वाढला. या सर्वांमुळे माणसांची मनुष्याची लोकसंख्या वाढू लागली, समाज बनू लागले, भाषेची, लिपीची गरज भासू त्यातून हळूहळू परंपरा, संस्कृती निर्माण होऊ लागल्या. मानवाच्या प्रगतीपथावर ही निसर्गाने त्याची साथ दिली. या प्रगती साठी लागणारी सर्व सामग्री या निसर्गाने आपल्याला दिली. पुढे मनुष्याने विजेचा शोध लावला, रस्ते बांधले, नौका बनवल्या, समुद्र प्रवास चालू केला यामागची कल्पना आणि प्रेरणा मानवाला निसर्गाकडूनच मिळाली.

                 मनुष्य आता खूप प्रगत झाला आहे त्याच्याकडे आता उंच उंच इमारती, चांगले रस्ते, विमाने, शस्त्रे, विज्ञान आणि ह्या मधील सर्व काही आहेत. मनुष्य मोठी स्वप्न पाहू लागला, त्याच्या मूल गरजा सहज भागू लागल्या, आणि तो आता भौतिक सुखांच्या मागे पळत आहे. मोठे घर, मोठी गाडी इत्यादी. या सुखांसाठी लागणारी सामग्री कुठून येते? या निसर्गाकडूनच.

                  मनुष्याच्या प्रगतीसोबत त्याची महत्वकांक्षा सुद्धा वाढली आता मनुष्य दुसऱ्या ग्रहांवर जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे जीवन शोधण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे जीवन बनवण्याचा प्रयत्न करतोय. अवकाश संशोधनातील उन्नत देश मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण या जीवनाचे चिन्ह काय आहे? कुठल्याही ग्रहावर जीवन सुरू होण्यासाठी निसर्ग लागतो, वातावरण लागते, समतोल तापमान लागते.

                 आपण पृथ्वी वरती असलेल्या सुंदर निसर्गाचा दिवसेंदिवस ऱ्हास करत आहोत आणि दुरच्या ग्रहांवर तोच निसर्ग बनवण्यासाठी धडपडत आहोत. याला मानवाची दांभिकता किंवा ढोंगीपणा (hypocrisy) बोलता येईल. आपल्याकडे जे आहे त्याचा नाश करून नसत्याच्या मागे पाळण्यामध्ये माणसाला वैज्ञानिक प्रगती चा आनंद मिळत आहे. विज्ञानाने आपल्याला शेकडो सुख सुविधा दिल्या आहेत पण ह्या विज्ञानाचा उपयोग दुसऱ्या ग्रहांचा शोध घेण्यापेक्षा आपल्या पृथ्वीला कसे सुखरूप आणि सुंदर ठेवता येईल याकडे दिला पाहिजे.

                 प्रदूषण, वृक्षतोड, वाढती लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या भयानक समस्या आपल्याला भेडसावत आहेत. या सर्वांवर निसर्गाचे संगोपन हा एकच तोडगा आहे, आज निसर्ग जपण्याची खूप गरज आहे. ज्या निसर्गाने आपल्याला जन्म दिला, आपले संगोपन केले, आपल्या प्रगतीचा सोबती झाला त्याच निसर्गाकडे आपला विनाश करण्याची ही ताकद आहे. आपण या निसर्गाची लूट करत आहोत त्याला जखमी करत आहोत. काही देश तर या निसर्गावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते क्लायमेट कंट्रोल शस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

                  अशी शस्त्रे ज्यांनी वाटेल तेव्हा, वाटेल तिथे पाऊस, दुष्काळ, पूर, भूकंप, वादळ निर्माण करू शकतात. ज्या निसर्गाने आपल्याला जन्म दिला त्या निसर्गाचा विनाश करण्याचा आपण प्रयत्न करतोय आहे. आणि हे असेच चालू राहिले तर हा निसर्गच आपला एक दिवस विनाश करेल.

                    आपल्या या नवीन पिढीला एकत्र यावं लागेल, निसर्गाचे संगोपन करावे लागेल. प्रदूषण कमी झाले पाहिजे, वृक्षारोपण वाढले पाहिजे, लोकसंख्या नियंत्रणात राहिली पाहिजे; या सर्वांवर विचार झाला पाहिजे नवीन पिढी एकत्र आली तरच आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना एक सुंदर, विशाल निसर्ग देऊ शकतो.