घड्याळ नसते तर
Ghadyal Naste Tar


                 वेळ अमूल्य आहे, वेळ म्हणजेच पैसा; असे आपण खूप वेळा ऐकलं आहे. आपण ठराविक वेळेत शाळेत येतो, ठराविक वेळेचे लेक्चर्स असतात. शनिवारी तर सकाळची शाळा असते, नेहमीपेक्षा लवकर उठावे लागते, नाही का? कल्पना करा जर घड्याळ नसतेच तर, किंवा घड्याळ बंद पडले तर. याच विषयावर मी आज तुमच्या समोर बोलणार आहे.

घड्याळ असण्याचे फायदे

                   खरंच घड्याळासाठी आपण की आपल्यासाठी घड्याळ हेच कळत नाही इतके आपले जीवन घड्याळाशी बांधले गेले आहे. आपल्या या मनुष्यजन्मात घड्याळाला अनन्यसाधारण महत्व आहे. माणूस जन्मल्यापासून ते मरेपर्यंत त्याचे घड्याळाशी नाते घट्ट असते. आपले जीवन हे घड्याळाच्या काट्याबरोबर बांधलेले असते.

                  विद्यार्थीदशेत घड्याळ पाहून अभ्यास, खेळ यांची दैनंदिनी बनवली जाते. घड्याळ पाहून शाळेत येणे, जाणे, नाष्टा करणे, एवढेच नव्हे तर जेवण सुद्धा आपण या घड्याळाच्या काट्यावर करतो. म्हणजेच दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सर्व कामे ही घड्याळावर अवलंबून असतात.

                   घड्याळाचे काम काय असते? वेळ दाखवणे. किती वाजले, किती तास, मिनिटे झाली. या साध्याश्या यंत्रामुळे आपलं दैनंदिन जीवन सुखकर होते. साल १९२७ मध्ये वॉरेन मार्रीसोन आणि .. हॉर्टन यांनी बेल टेलेफोन लॅबोरेटरी मध्ये क्वार्ट्ज (quartz) घड्याळाचा शोध लावला. क्वार्ट्ज हा एक क्रिस्टल ऑसीलेटर किंवा आंदोलक आहे, जे अतिशय तंतोतंत वारंवारितेसह सिग्नल तयार करते, ज्यामुळे क्वार्ट्ज ची घड्याळे यांत्रिक घड्याळांपेक्षा अचूक सिग्नल्स देतात. क्वार्ट्ज ला सिलिकॉन डायओकसाइड सुद्धा म्हटले जाते आणि हे एक पीएझोइलेक्ट्रिक मटेरियल आहे. या तंत्राने माणसाचे जीवन सुखकर बनवले.

जर आज घड्याळ बंद पडले तर (कायमचे)

                   कुठल्याही वस्तूची, अनुभवाची आपल्याला सवय होते, आणि ती अचानक बंद झाली, थांबली तर कोणाचीही अव्यवस्था होणार. तसेच, घड्याळाचे आहे. जर घड्याळ कायमचे बंद पडले तर, आपल्याला वेळ कळणार नाही, सर्व कामाच्या वेळा चुकतील. वेळाची नोंद ठेवावी लागेल, सकाळी उठवण्यासाठी क्लॉक / गजर नसेल, सूर्य देवावर आपण अवलंबून असू. परत एकदा आरवणारा कोंबडा पाळावा लागेल.

                    या सर्वाने अडचण, त्रास नक्कीच होईल पण माणूस हा एक झुंजारू प्राणी आहे, आपण हळू हळू याची सवय करून घेऊ. विसरू नका की, माणूस ही प्रजात त्याच्या बुद्धीसाठी ओळखली जाते, कोणीतरी वेळ मोजण्याचा नवीन प्रकार अवगत करेल.

घड्याळ नसतेच तर

                   घड्याळ नसते तर.. कल्पनाच करवत नाही.  खरंच घड्याळ नसेल तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेचे सर्वच गणित चुकेल. घड्याळ नाही तर उठायचे कधी, शाळेत जायचे-यायचे कधी हे काहीच समजणारच नाही. घड्याळ नसल्याने मारकुटे मास्तर तासाची वेळ संपून वर्गाबाहेर पडण्याचीही शक्यता नसणार, त्यामुळे त्यांचा मार जास्त वेळ सहन करावा लागणार. घड्याळच नाही तर प्रत्येक तासानंतर शिपाई घंटा कशी वाजवणार. घड्याळ नसेल तर सर्व लोकांमध्ये शिस्त आणि नियमावली राहणार नाही. त्यामुळे सगळीकडेच अंदाधुंदी माजेल. एस.टी., रेल्वे, विमान यांना परिपत्रक नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. अशाने आळशी लोकांना आनंद होईल पण कष्ट करणाऱ्यांना अशा गोष्टींचा त्रास होईल.

                    घड्याळे बनण्याच्या अगोदरही आयुष्य व्यवस्थित चालायचे. पृथ्वी वरती माणसाची वसाहत हजारो वर्षांपासून आहे, आणि तेव्हा घड्याळ नव्हते. पुरातन काळात लोक सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र यांच्या सहाय्याने वेळ मोजत असत. खूप लोकांना हे माहीत नाही की, वेदिक काळातही खूप अवगत वेळ मोजण्याची प्रणाली होती, अगदी परमाणु (१७ मैक्रोसेकंड्स) ते महा-मन्वंतर (३११.०४ ट्रिलियन वर्षे). तेव्हा २४ तास म्हणजे दिवसाला अहोतरम मध्ये मोजत, तर आजचे . मिनिट्स म्हणजेएक लघुअसे. त्याच प्रमाणे एक मास म्हणजे महिना, अयान म्हणजे महिने, आणि समवत्सर म्हणजे वर्ष.

                    अशा बेधुंद जगात राहण्यापेक्षा वेळेचे भान दाखविणारे दोन काट्यांचे हे घड्याळ माणसाला माणुसकीने जगायला शिकवते. पशूपेक्षा मानवजीवन वेगळे आहे याची जाणीव करून देते. घड्याळ वेळ पाहून, वेळेचे भान ठेवून वक्तशीरपणाने काम करायला शिकवते. म्हणूनच आपल्यासाठी घड्याळ खूप महत्वाचे आहे.