एका अपंगाचे आत्मवृत्त 
Autobiography of a Disabled Person


माझे कथन सुरू करण्यापूर्वी प्रथम मी दूरचित्रवाणीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो. कारण त्यांनीच मला तुम्हा सर्वांसमोर उभं राहण्याची ही संधी दिली आहे. मी आता 'उभं राहण्याची' असा उल्लेख केला, पण तो वास्तव नाही; कारण मी आता तुमच्याशी बोलत आहे ते बसूनच. कारण मी कधीच उभा राहू शकलो नाही. त्याचं कारण म्हणजे मी जन्मतः अपंग आहे. तुम्हा सर्वांसारखा मी स्वतःच्या पायांवर कधीच उभा राहिलो नाही.

“मी वर्षाचा झालो. तेव्हाच माझ्या आईच्या हे लक्षात आलं. ती माऊली निश्चित हबकली असणार, पण माझी आई मोठी धीराची होती आणि आईमुळेच मी आज तुमच्यासमोर निराळ्या अर्थाने उभा आहे. अपंग असूनही स्वावलंबी आहे. मला उभं राहता येत नाही हे लक्षात आल्यावर आईवडिलांनी सर्व उपाय योजिले. डॉक्टरी इलाजांबरोबर इतरही सर्व उपाय योजिले गेले. पण मी उभा राहू शकणार नाही असं निश्चित झाल्यावर माझ्या आईने मला वेगळ्या अर्थाने उभे केले.

 

"माझे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माझ्यासाठी चाके लावलेला एक पाट तयार करण्यात आला. या पाटावर बसून मी सर्वत्र हिंडत असे. इतर मुले धावाधावी, छपाछपी खेळत ते पाहून माझ्या या अवस्थेबद्दल मला वाईट वाटे. पण ही उणीव माझी आई भरून काढीत असे. ती माझ्याशी त-हेतहेचे खेळ खेळत असे. कथा, कविता व इतर माहिती सांगत असे. आज माझ्या लक्षात येते की, त्यावेळी आईने मला ज्या कथा सांगितल्या त्या सर्व कथा संकटांवर मात करणाऱ्या शूरांच्या असत. त्यांतील सूर्यसारथी अरुणाची कथा मला अधिक जवळची वाटे. त्या कथांनी माझे मन उभारले गेले. आपल्यातील उणिवेची मला कधी खंत वाटली नाही. आपण आपल्या व्यंगावर मात केली पाहिजे असे वाटू लागले.

 

 “घरी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबांनी माझ्यासाठी तीन चाकांची खुर्ची तयार केली. तीत बसून मी शाळेत जाऊ लागलो आणि खरं सांगतो, तेथे मला एक विलक्षण आनंद गवसला. खुर्चीवर बसून प्रवास करताना अनेक अडचणी येत. पण माझे दोस्त मला मदत करीत. शाळेत ते जेव्हा कोणताही खेळ खेळत तेव्हा मी पंचाचे काम करीत असे; आणि त्यांच्याइतकाच खेळाचा आनंद लुटत असे. माझ्या अपंगत्वाचा त्यांनी कधीच उपहास केला नाही. मला आठवतं, एकदा शाळेत एका मुलानं माझा उल्लेख 'पांगळा' असा केला, तर माझ्या एका मित्राने त्याच्या खाडकन मुस्कटात दिली. एकंदरीत दोस्तांच्या बाबतीत तर मी अतिशय भाग्यवान ठरलो आहे. आपण केलेल्या चुकीची भरपाई करण्यासाठी परमेश्वराने मला बुद्धिमत्ता बरी दिली असावी म्हणूनच की काय शालेय व महाविदयालयीन शिक्षण मी विशेष गुणवत्ता मिळवून पार पाडू शकलो.


“एम्. एस्सी. झाल्यावर मी स्वतःचा छोटासा रासायनिक कारखाना काढला. त्यावेळी अनेकांचे मदतीचे हात मला मिळाले. आज माझा हा कारखाना नावारूपाला आला आहे; त्याचे कारण हे सारे सहकाऱ्यांचे हात! माझ्या कारखान्यात मी नेहमी अपंगांचीच नेमणुक करतो. माझ्या आईने जे रोपटं माझ्या मनात फुलविलं तेच इतरांच्या मनांत फुलविण्याचा मी यत्न करतो. त्यासाठीच हा मुलाखतीचा प्रपंच. माझ्या दोस्तांनो, तुमच्यातील उणीव विसरून जा. तिचे भांडवल करू नका. प्रयत्नाच्या मार्गावर तुम्ही धावू लागा आणि मग तुम्हांला आढळेल की, असे कितीतरी जण तुमच्याबरोबर धावत आहेत."