माझे आवडते शिक्षक 
My Favorite Teacher

मराठीचा पहिलाच तास ! गोडबोले सरांनी वर्गात पाऊल ठेवलं आणि माझी कळी खुलली. सरांविषयी इतकं ऐकलं की कधी त्यांचा तास येतो असं मला झालं होतं. 'मराठी शिकवण्यात त्यांचा हात धरणारं कोणी नाही' अशी त्यांची ख्याती ! पण ते दहावीलाच शिकवायचे, त्या वर्षी प्रथमच नववीला आले होते.

आत्यंतिक आदराने मी त्यांच्याकडे पाहात होतो . पायात चपला, हिरवट रंगाची पैंट, पांढरा शर्ट, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात अंगठी, गौरवर्ण, पिंगट बोलके डोळे, कोरीव मिश्या, मुख्य म्हणजे अतिशय प्रसन्न हसणं

हजेरी सुरू झाली. “ आपटेऽ...” " येस्स सरऽ!” पहिल्याच हजेरीला सरांनी वर बघितलं. मिस्किल हसले, “ मुलांनो! तास मराठी मग उत्तर इंग्रजीतुन का रे. 

माहीत आहे मराठीचा गोडवा आणि शक्ती ?" त्यांनी हजेरी बाजूला ठेवून मग अमृताची बरसात केली. 'माझा मराठाचि बोलु कवतुके..' अशी । मराठी भाषा, तिचं सौंदर्य, पावित्र्य, आवश्यकता, थोरवी, ...अशा काही रसाळपणे सांगितल्या की तासाची घंटा झाली तेव्हा कळलेच नाही की वेळ कुठे निघुन गेला.

त्यांना मी नेहमी ' गोडबोले सरच' म्हणायचो गोडबोलें सरांची वाट आम्ही नेहमीच आतुरतेनं पाहात असू. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. त्यांनी पुस्तक हाती कधी धरलंच नाही. धड्यावरचे प्रश्न लिहून दिलेच नाहीत. धडा घरून वाचून यायला सांगायचे आणि वर्गात तो धडा ज्यांनी लिहिला त्यांची माहिती, का लिहिला, कुठल्या मनःस्थितीत लिहिला ही पार्श्वभूमी, ज्यातून तो धडा घेतला त्या पुस्तकाची माहिती, धड्याचा आशय, त्यातील सौंदर्य, तसे समान दाखले -इतर पुस्तकातले, जीवनानुभव, तत्त्वज्ञान, मार्गदर्शन...असं करत करत तो धडा व्हायचा.

मराठीतल्या साऱ्या अलंकारांनी आम्ही सारे नटलो. ' गोडबोले सर' कधी रागवायचे नाहीत. तास कधी बुडवायचे नाहीत. अंगात ताप  असताना शिकवलेलं मी पाहिलंय, आम्हीही कधी तास चुकवायचो नाही. त्यांच्या वाणीत जादूच तशी होती ! ते शिकवत असताना ज्ञानेश्वर, नामदेव, गिरीश, पाडगावकर, लोकहितवादी, गोरे, अत्रे, फडके...हे सारे त्यांच्या रोजच्या बैठकीला असतात असे वाटायचे. इतर विषयांचा द्वेष त्यांनी कधी केला नाही. 

इंग्लिश मीडियमची लाट पाहून ते खंतावायचे. म्हणायचे " अरे ! आपल्या आईची सेवा आपण नाही केली तर इतर कोणी येऊन करणार आहे का ? आपली आजी संस्कृत, अगोदरच रानोमाळ भटकते आह

दहावीच्या निरोप समारंभाचे वेळी सर गोडबोल्यांनी केलेलं भाषण शिल्प होऊन मनात बसले आहे. ते म्हणाले, "आता तुमच्या दिशा बदलतील...भाषा बदलतील ....आचार बदलतील...विचार बदलतील...माणसं कपडे बदलतात...राहायची घरं बदलतात, पण आपलं कुलदैवत नाही बदलत, पिढ्यान् पिढ्या तेच ठेवतात. तसं तुम्ही तुमचं मराठीपण, मराठी भाषा हे कुलदैवत, या बदलत्या काळातही अभंग, अखंड ठेवा हीच इच्छा !...शुभास्ते पंथानः सन्तु !"

मराठीवर असं सपाटून प्रेम करणाऱ्या आणि आम्हालाही आमच्या न कळत करायला लावणाऱ्या सा गोडबोलेंना मी कशी विसरेन ? आजही माझ्या अभ्यासिकेत मराठी साहित्याचा पुस्तक ठेवा, त्यांचीच आठवण म्हणून, साठवण केलेला तुम्हाला दिसेल!