माझे गाव 
My Village

आज मी माझ्या गावाची हकिकत सांगणार आहे. त्याचे कारणही महत्त्वाचे आहे. नुकताच शासनाकडून 'निर्मल ग्राम' हा गौरव पुरस्कार माझ्या गावाला मिळाला आहे. पुरस्कारापोटी दोन लाख रुपये मिळाले. हजारो गावांत माझे  गाव 'निर्मल ग्राम' ठरले याचा मला मोठा अभिमान वाटतो.


सह्याद्रीच्या कुशीतील अणूर हे एक खेडे. जमीन खडकाळ, बरड. फारशी सुपीक नाही. पाण्याची तर नेहमीचीच ओरड. गावात साधारण सहाशे-सातशेपर्यंतची वस्ती. गावात शिक्षणाचे प्रमाण कमी. सहकार्य जवळजवळ नाहीच. स्वच्छता बाळगण्याची वृत्ती नाही. गाव एकंदरीत बकाल बनला होता.


अशा या गावाचे एवढे परिवर्तन कसे झाले? गावाचेच सुदैव म्हणायचे ! गावातला रघू शहरातून गावाकडे परत आला; म्हणून हे सारे घडले ! रघू शहरात नोकरी करत होता. पण त्याची प्रकृती ठीक राहीना म्हणून तो गावाकडे परत आला. रघूला बरे वाटले आणि त्याने गावातच राहायचे ठरवले. रघूला स्वस्थ बसवेना. त्याने सर्व गावकऱ्यांना एकत्र केले. तो गावात नवा असल्याने त्याचे गावातील कोणाशीही भांडण नव्हते. त्यामुळे त्याच्या विनंतीवरून सगळे एकत्र जमले. रघुने स्वच्छ सुंदर गावाची कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली. बहुसंख्य लोकांनी रघूची टिंगल केली.


रघूने कामाला सुरुवात केली. प्रथम त्याने प्रत्येक घराला संडास बांधायची कल्पना मांडली. गावकऱ्यांबरोबर तो स्वतः काम करत असे. गावाची दुसरी अडचण होती ती पाण्याची. गावातल्या महिलांना खूप दूरवरून पाणी आणावे लागत असे. रघूने यासंबंधी खूप विचार केला. काही जाणकारांशी चर्चा केली. त्याने जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात तीन विहिरी खणल्या. काही बोअर विहिरी काढल्या आणि जो काही तुटपुंजा पाऊस पडतो त्याचे पाणी अडवण्याचे उपाय सुचवले. बघता बघता गावाचा कायापालट होऊ लागला. गोबर गॅस, ओल्या कचऱ्यापासून खत असे काही प्रकल्प यशस्वी झाले. रघूने पारंपरिक शेतीला वनशेतीची जोड दिली. गावाची आर्थिक स्थिती सुधारली.


गावातील भांडणे संपली. गावकरी गुण्यागोविंदाने राहू लागले. एकमेकांच्या मदतीला जाऊ लागले. गावात दहावीपर्यंत शाळा सुरू झाली. लघुउदयोग सुरू झाले. लोक विधायक कामात गुंतले. बघता बघता माझा गाव निर्मळ झाला. साऱ्या महाराष्ट्रात 'निर्मल ग्राम' हा किताब मिळवणारा माझा गाव आज साऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाला आहे. अशी आहे आमच्या आदर्श गावाची कथा.