माझा आवडता ॠतू पावसाळा
My Favourite season is Rainy

                 पृथ्वीवरती विविध ऋतू आहेत, जसे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे ऋतू म्हणजे निसर्गाची अजब जादूगारीच म्हणावी लागेल. या बदलत्या ऋतूंमुळेच पृथ्वीवरती सजीव जन्माला आले आणि त्यांची प्रगती झाली. भुतळ,वारा, पाणी, दबाव, चंद्र, सूर्य मिळून हा ऋतूंचा अजब आणि अनोखा खेळ मांडतात, ते सुद्धा दरवर्षी, चुकता.

                  तसे सर्वच ऋतू महत्वाचे आहेत अगदी ग्रीष्म ऋतू पासून वसंत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर सगळेच पण मला आवडतो तो पावसाळा किंवा वर्षा ऋतू. तसा सर्वाना हिवाळा जास्त आवडतो, मला हि आवडतो पण पावसाळ्याची गोष्टच वेगळी आहे.

                     जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर कधी मे च्या शेवटच्या आठवड्यात आभाळ दाटू लागते, वारा सुटतो, आणि पावसाची पहिली सर पडते. मातीचा सुटलेला वास, वातावरणात अचानक पसरलेला गारवा वेगळाच आनंद देऊन जातो. या क्षणांची जादू काही अशी असते कि भरपूर कवी, लेखकांना प्रेरणा देते. पावसाच्या या पहिल्या सरीचे अनुभव त्यांनी आपल्या शब्दामध्ये कैद करून ठेवले आहेत. माझा आवडता कवीसौमित्रम्हणजेच किशोर कदम यांची एक कविता मला खूप आवडते,

    उन्ह जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं
    भर उन्हात पाऊस घेउन आभाळ मनात दाटतं
    तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही
    घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही

    तितक्यात कुठून एक ढग सुर्यासमोर येतो
    उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो

    वारा उनाड मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो
    पाना फुला झाडावरती छ्परावरती चढून पाहतो
    दुपार टळुन संध्याकाळ्चा सुरु होतो पुन्हा खेळ
    उन्हामागुन चालत येते गार गार कातर वेळ

    चक्क डोळ्यांसमोर ऋतु कुस बदलून घेतो
    पावसाआधी ढगांमधे कुठून गारवा येतो

                  पावसाळा फक्त कवीमन प्रसन्न करत नाही तर धरतीला सुद्धा तृप्त करतो, म्हणून मला पावसाळा ऋतू आवडतो. उन्हाने होरपळलेली धरती, झाडे, झुडपे आभाळातून पडलेले अमृत पिऊन खूष होतात. पाऊस आपले ओढे, नाले, नद्या पाण्याने भरतो; आपली पिके पिकवतो. जमिनीत मुरलेले हे पावसाचे पाणी मग झरे, विहिरी, बोअरवेल च्या रूपाने बाहेर येते आणि वर्ष भर आपली तहान भागवते.

                   भारत अजूनही एक शेती प्रधान देश आहे, भारतातील ६७% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने शेतीवर अवलंबून आहेत. हि शेती मोठ्या प्रमाणात मान्सून हंगामावर म्हणजेच पावसावर अवलंबून आहे. हा पावसाळा लाखो लोकांना उपजीविकेचे साधन देतो, त्यांचे पोट भरतो, आणि म्हणून मला पावसाळा आवडतो. आपल्या भारतामध्ये पावसाला देवाचा दर्जा दिला जातो आणि त्यांची पूजा, अर्चना सुद्धा केली जाते.