राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त 
Autobiography of the National Flag

भारताच्या राजधानीत माझा मुक्काम होता. एकएक वास्तू निरखीत मी नव्या दिल्लीच्या रस्त्यांवरून हिंडत होतो. राष्ट्रपतिभवनासमोर उभा असताना त्या भव्य वास्तूवरील राष्ट्रध्वजाने माझे मन आकर्जून घेतले. खरे पाहता, राष्ट्रध्वज आपल्या पूर्ण परिचयाचा, पण आज त्या भव्य वास्तूवर वाऱ्याबरोबर फडफडणारा आमचा राष्ट्रध्वज मला आगळावेगळाच भासत होता त्याच्याकडे पाहत असतानाच मला असं वाटू लागलं की, जणू काही ध्वज माझ्याशी बोलत आहे. त्या विचारातच मी बागेत बसलो. निळया आकाशाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा फडकत होता. मी एकटक त्याच्याकडे पाहत होतो. मला जणू तो सांगत होता.

 

"तू माझ्याकडे एवढया आदराने पाहतोस. त्याचं कारण तुला माहीत आहे का?" राष्ट्रध्वज मला विचारत होता, “मी तुझ्या राष्ट्राचे प्रतीक आहे. मी म्हणजेच भारत. मला दिलेला सन्मान हा भारताचा सन्मान ठरतो. माझ्यामागे माझा उज्ज्वल इतिहास आहे. माझे आजचे हे रूप, आजचे हे स्थान मिळविण्यासाठी मला फार मोठ्या आपत्तीतून जावे लागले. माझ्या शूर सुपूत्रांची साथ मला सदैव लाभली. 


“१८५७ पासूनच भारतीयांनी आपल्या गुलामीचे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न चालविला होता. परक्या इंग्रजांच्या बलाढय शक्तीला ते टकरा देत होते, तेव्हा मी त्यांना साथ देत होतो तेव्हा माझा रंग हिरवा होता आणि चारी बाजूंना बारीक सोनेरी पट्टी होती. पुढे प्रत्येक स्वातंत्र्यआंदोलनात माझी उपस्थिती होतीच. माझ्या वीरांना रक्त सांडण्याची स्फूर्ती मिळावी म्हणून मी माझ्या अंगावरील सोनेरी पट्टीचा रंग केशरी केला. माझ्या रूपात वेळोवेळी बदल होत गेला. हिरव्या व केशरी रंगांमध्ये पांढरी पट्टी आली. कधी माझ्यावर 'वंदे मातरम्' ही अक्षरे आली तर कधी सूर्य, चंद्र; कधी कमळे. १९२० नंतर मी तिरंगा बनलो व स्वदेशप्रेमाचे प्रतीक असा चरखा माझ्यावर आला. स्वातंत्र्योत्तर काळात मी 'राष्ट्रध्वज' बनलो तेव्हा माझ्या अंगावर अशोकाचे हे निळे चक्र आले.


"माझा केशरी रंग देशभक्ती आणि त्याग यांचे प्रतीक आहे. माझा पांढरा रंग आमची शांतताप्रियता आणि मांगल्य सूचित करतो; आणि हिरवा रंग आमच्या धनधान्याच्या समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निळे चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, 'हे राज्य धर्म, नीती आणि प्रगती यांच्याच पथावर सदैव राहील.' हे युवका, समजला ना माझा संदेश? आता तुमच्या नव्या पिढीवर फार मोठी जबाबदारी आहे. कसली माहीत आहे! माझी शान टिकविण्याची.


"अरे मित्रा, आजवर माझ्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. स्वातंत्र्यलढयात हातावर लाठ्या बसल्या, बंदूकीच्या गोळ्या बसल्या तरी त्यांनी मला कधी खाली पडू दिले नाही. हे स्वातंत्र्यसैनिक देशासाठी हसतहसत फासावर चढले तेही मला हातात घेऊन. काहीजणांनी सरकारी कचेरीवरील युनियन जॅक काढून तेथे मला फडकविण्यासाठी सहा-सहा महिन्यांची सजा भोगली. ते सारे रोमांचकारक क्षण आजही डोळ्यांसमोर आहेत. हे सुपुत्र जेव्हा माझ्या रक्षणासाठी बलिदान करतात, तेव्हा मी दुःखित अंतःकरणाने माझ्या उच्च स्थानावरून : खाली येतो.


“१९४७ साली १४ ऑगस्टच्या रात्री व पंधरा ऑगस्टच्या पहाटे मी जेव्हा ध्वजस्तंभावर चढत होतो तेव्हा कोट्यवधी डोळे माझ्याकडे लागले होते. तेव्हापासून माझ्या सुपुत्रांनी माझी शान राखली आहे. रणांगणावर जसा मी फडकलो, तसाच क्रीडांगणावरही विजयी वार्ता फडकवीत राहिलो. हिमालयाच्या शिखरावर शोभलो, त्याचप्रमाणे सागरसम्राटवरही राहिलो. परदेशांतही मला आता मानाचे स्थान आहे; कारण मी एका स्वतंत्र देशाचा राष्ट्रध्वज आहे.

 

“मुला, तू एवढया अभिमानाने माझ्याकडे पाहतोस म्हणूनच मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलतो आहे. नाहीतर आजचा यूवक आपल्या स्वतःतच एवढा गुरफटलेला असतो की त्याचे माझ्याकडे लक्षही जात नाही. पण लक्षात ठेवा; माझा सन्मान म्हणजे तुमच्या राष्ट्राचा सन्मान म्हणजे पर्यायाने तुमचाच सन्मान आहे."पाहता पाहता आवाज बंद झाला; मी मात्र राष्ट्रपतिभवनावरचा ध्वज डौलाने फडकत असलेला पाहून सुखावत होतो.