रस्त्याची कैफियत 
Road Accident

“ऐका, ऐका माझी ही कैफियत. कैफियत कसली, तुमच्या दृष्टीने ही तर एक रडकथा आहे.” संध्याकाळच्या रहदारीच्या गर्दीच्या वेळी तो वाहता रस्ता बोलू लागला आणि काय चमत्कार, सारी रहदारी चित्रासारखी निश्चल झाली. सारे आवाज एकदम बंद झाले. रस्ता आपल्या दर्दभऱ्या आवाजात सांगू लागला, "आज कित्येक वर्षे मी तुमची सेवा करतो आहे. पण आहे का तुम्हांला काही याची कदर? केवळ आपल्या लाथांनी मला तुडवता. पण कधी माझ्या अंतःकरणाचा विचार केलात का?

"हे पांथस्थांनो, तुम्हांला वाटते मी पाषाणहृदयी आहे; पण बाबांनो, तसे नाही रे. मलाही हृदय आहे. क्षमाशीलतेचा आदर्श म्हणून तुम्ही या क्षमे'कडे पाहता, तिचाच वारस मी. तरीपण केव्हा ना केव्हा माझीही क्षमाशीलता संपते आणि आपणही बंड करून उठावे अशी ऊर्मी माझ्या अंतःकरणात उठते आणि मग कुठे कुठे माझे अंतरंग विदीर्ण होते. पण "त्याची शिक्षाही मला भोगावी लागते. टोचणारी खडी, उकळते डांबर आणि प्रचंड वजनाचा रोलर हे तर जन्मापासूनच माझ्या भाळी मारले गेले आहेत. ज्या ज्या वेळी माझ्या अंतःकरणाला तडे पडतात, तेव्हा पूनः पून्हा मला कुदळीचे घाव, खडीचा मारा, डांबराचे चटके, रुळाचा भार सहन करावा लागतो आणि एवढया कष्टाच्या चक्रातून गेल्यावरही मला काय मिळते? तुम्ही म्हणता, 'टाकीचे घाव सोसणाऱ्याला देवपण येते.' असे देवपण माझ्या वाटयाला कधीच येत नाही. माझ्या वाट्याला नेहमी येतात ते लत्ताप्रहार. निष्ठूर वाहनांच्या चाकांचा कठोरपणा!

“एवढे साहून माझ्या नशिबी काय येते? साधे नाव तरी पाहा-'सोनापूर मार्ग.' तेथेही आमच्या वाट्याला आली ती सोनापूरची वाट. असं म्हणतात की, पूर्वी येथे कोठेतरी जवळच सोनापूर म्हणजे स्मशान होते. आज ते सोनापूर अस्तित्वात नाही. पण मी मात्र कायमचा ‘सोनापूर मार्ग' झालो. नाहीतर इतर रस्त्यांना किती सुंदर नावे असतात. कुणावर लक्ष्मीचा वरदहस्त असतो, तर कुणी थोर नेत्यांच्या नावांनी पुनीत झालेले असतात. कुणी समाजसेवकांची स्मारके ठरतात, तर कूणी एखादया अमर घटनेला आपल्या ठायी चिरंजीव करतात. ते भाग्यही माझ्या भाळी आले नाही.

“हे मुसाफिरा, या अभाग्याच्या अंगावर कधी कुणा महात्म्याचे पाय पडले नाहीत. आजकाल ही बडी मंडळी सदैव मोटारीत बसून भुर्रकन निघून जातात. इतर रस्त्यांना मोठमोठ्या मोर्च्यांचे  तरी भाग्य लाभते, मला तेही लाभत नाही. गरिबांच्या वस्तीत वास्तव्य करणाऱ्या मला कधीतरी नव्या नवरानवरीच्या वरातीचा संग लाभतो, तर कधी एखादया देवाची पालखी भेटीला येते. जत्रेच्या दिवसांत मात्र मी अगदी नटूनथटून बसतो. तेवढेच काय ते समाधान माझ्या पदरी पडते. आता माझी एकच इच्छा आहे की, माझे सारे अंग तेजस्वी दिव्यांनी उजळून निघावे आणि स्वदेशासाठी झगडणाऱ्या स्वदेशभक्तांची पावले माझ्यावर पडावी.

"मित्रांनो, या कष्टमय जीवनातही मला काही सार्थकतेचे क्षण लाभतात. रात्रीच्या वेळी अनेक थकलेभागले जीव माझा आसरा घेतात. तेव्हा त्यांना माझा टणकपणा टोच नये, माझे थंडगार अंग दुःसह होऊ नये म्हणून मी मार्दवता धारण करतो, पोटातील ऊब शरीरावर आणतो आणि शांतपणे निद्राधीन झालेल्या त्या जीवांना पाहून जीवनाचे सार्थक मानतो.