भाऊराव पाटील 
Bhaurao Patil


कर्मवीर भाऊराव पाटील 'स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य' हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री मानणारे 'कर्मवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षणतज्ज्ञच म्हटले पाहिजे. 'कमवा आणि शिका' असा अतिशय सोप्या भाषेत शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर एक श्रेष्ठ समाजसुधारकही आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ ला  जन्मलेले हे बालक बालपणापासून हट्टी स्वभावाचे होते. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे वडिलांसोबत भाऊरावांच्या पायालाही भिंगरी लागलेली. परंतु भाऊरावांचे मामा हे पैलवान, त्याचा मित्र सत्याप्पा हा तर शूर साहसी अन् त्याबरोबर दयाळू अन् गरिबांचा वाली. तो श्रीमंताकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे. त्याच्या चातुर्याच्या, हिमतीच्या चांगुलपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होत होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच सत्याप्याकडून मिळाले होते.

भाऊरावांचे शिक्षण बेताचेच. वसतिगृहात शिकत असताना तेथील नियम हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरुद्ध दिसल्याबरोबर भाऊरावांनी वसतिगृह सोडले. आणि आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. कुस्ती-मल्लखांब यासारख्या खेळात ते नेहमीआघाडावर असल्यामुळे त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या वाड्यात आश्रय मिळाला, शाहू महाराज्याकडून समाजसेवेचा वारसा घेतला. पुढे उद्योगाच्या निमित्ताने ते जेव्हा भारतभर फिरून आले तेव्हा त्यांचा 'शिक्षणाचा पिंड गप्प बसू देईना,' "विचार, आचार, उच्चार' यांचे उगमस्थान म्हणजे खरे शिक्षण, सत्य सामाजिक समता या सर्वांचा संगम त्यांना शिक्षणात दिसला, इतकेच नव्हे तर जनजागृती-समाजक्रांतीसाठीही शिक्षणासारखे दुसरे माध्यम नाही, अशी त्यांची खात्री झाली.


म. फुल्यांचा पाईक बनून दुधगाव येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. पुढे १९१९ मध्ये कराड तालुक्यातील वाले या गावी 'रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. एकूणच शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून जनसामान्याच्या मुलांसाठी अतोनात कष्ट भाऊरावांनी घेतले. या त्यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाईंचा हातभार फार मोठा हाता, कमवा आणि शिका' हा कर्मवीरांचा शिक्षणापाठीमागचा मूलमंत्र तर रयतेला पटवून देण्यासाठी ती स्वावलंबी शिक्षणाची कल्पना प्रत्यक्षात ते जगले. बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देऊन गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचण्याचे व्रत त्यांतनी आयुष्यभर पाळले.

'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' गीतेतील या महान संदेशानुसार कर्मावर त्यांचा गाढा विश्वास होता, कोणतेही काम किंवा श्रम हे हलके नसते. काम म्हणजे ईश्वर त्याच श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे कार्य, पावित्र्य देण्याचे काम, स्वावलंबनाचा आनंद लुटू देण्याचे महान श्रेय कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानातून दिसून येते.