लाबफूलाचे मनोगत 
Labafulache Manogat


“मित्रांनो, या तुमच्या समारंभात आज मला भाषण करण्याची संधी हवी आहे. मला ओळखलेत ना तुम्ही ! अहो, तुमच्या या समारंभातील मी सम्राज्ञी आहे. आज दोन दिवस येथे हे प्रदर्शन चालू आहे. या गुलाबपुष्प प्रदर्शनातील सम्राज्ञी ठरलेली मी एक गुलाबकळी. या प्रदर्शनात मी पहिला क्रमांक मिळविला आहे. तो मान तुम्हीच मला दिलात. हजारो फूलांतुन माझी निवड  झाली आहे. त्या निमित्ताने माझ्या मालकिणीचाही गौरव झाला आहे.


“माझ्या मालकिणीचे श्रेय मी मान्य करतेच. कारण तिने घेतलेल्या निगराणीमुळेच मलो आजचे हे सौंदर्य प्राप्त झाले आहे. दिवसातील बराच वेळ ती आमच्यासाठी खर्च करते. त्यासाठी ती बरेच वाचन करते, संशोधन करते आणि त्यामुळेच अनेकदा माझ्या मालकिणीला गुलाबपुष्प प्रदर्शनात बक्षिसे मिळतात. तिचा छंद आज तिचा ध्यास झाला आहे.


“आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. आम्हां गुलाबपुष्पांचा जन्म माणसाच्या जन्मापूर्वीच झालेला आहे. तसे संदर्भ आढळतात. पण आमची निश्चित जन्मभूमी कोणती हे मात्र कुणाला सांगता येत नाही, तरी प्राचीनकाळी रोम हे गुलाबांच्या बागांसाठी विख्यात होते. दहाव्या शतकात अरबांनी आम्हांला भारतात आणले. तुमच्या प्राचीन वाङ्मयात आम्हांला अनेक नावांनी संबोधिलेले आहे. त्यांतील एक नाव आहे 'तरुणीपुष्प.' किती यथार्थ नाव आहे हे! तरुणतरुणींत मी विशेष प्रिय आहे. एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीकच ते मला मानतात. मोगल राजांच्या काळात आमची लोकप्रियता विशेष वाढली. जहांगीर बादशहा ब बेगम नूरजहान यांच्या विवाहप्रसंगी आमच्यापासून प्रथम अत्तर तयार करण्यात आले.


“आज आमच्या हजारो जाती तयार करण्यात आल्या आहेत. पण सर्वच जाती सुगंधी नाहीत. नाना आकार, नाना रंग. मित्रांनो, आजवर आम्हांला अनेक गौरव लाभले. पंडितजींच्या कोटावरील लाल गुलाब हा विश्वप्रेमाचा संदेश देत होता. आज गुलाबपुष्पांचा छंद विश्वव्यापी झाला आहे. त्यामुळेच जगभर ठिकठिकाणी आमची प्रदर्शने भरविली जातात.


“या सगळ्यात एक खंत आहे की हे माझे वैभव फक्त काही मूठभर लोकांचीच मिरासदारी झाली आहे. गुलाबाचा छंद जोपासणे म्हणजे चिक काम आहे. त्यामुळे गोरगरीब याकडे वळतही नाहीत. कालपासून मी पाहते, एवढी मंडळी माझे सौंदर्य पाहून गेली पण त्यांत एकही श्रमिक नव्हता, झोपडपट्टीतील एकही मूल नव्हते. मी मान्य करते की माझ्यासारखी फुले देणारी झाडे ते लावू शकणार नाहीत पण या प्रदर्शनातील हजारो फुलांचे अनुपम सौंदर्य ते आपल्या डोळ्यांनी लुटू शकणार नाहीत का? हा आगळा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. दोन दिवस हे प्रदर्शन तिकिट लावून झाले. आता एखादा दिवस विनातिकिट हे प्रदर्शन ठेवले तर चालणार नाही का? भाकरीमागे धडपडणाऱ्या मंडळींना मुद्दाम येथे आणले तर ... तरच माझ्या या अल्पायुषी जीवनाचे खरे सार्थक होईल.”