स्वतंत्रतेची कैफियत 
Swatantratechi Kaifiyat


“अरे अज्ञ मुलांनो, जरा इकडे लक्ष दया. मला बोलू दया. माझे डोळे तुमचे हे सहस्र अपराध पाहन आता थकले आहेत. ओळखलंत ना मला! मी आहे तुमची 'स्वातंत्र्यदेवता.' आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत असे तुम्ही केवढे अभिमानाने सांगता. तेव्हा क्षणभर मी रोमांचित होते, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या तुम्हांला पाहिले ना की, मी व्यथित होते.

 मला प्राप्त करण्यासाठी तुमच्या काही बांधवांनी प्राणांची बाजी लावली. आठवा त्यांचा त्याग! केवळ 'हुतात्मे' म्हणून वर्षातून एक दिवस त्यांचे स्मरण करून तुमचे त्यांच्याविषयीचे कर्तव्य संपत नाही. माझी प्राप्ती करून घेण्यासाठी ज्या माझ्या एका सपत्राने प्राण दिले त्याची दुर्दैवी पत्नी आज चार घरची भांडीधुणी करून आपले व आपल्या चार मुलांचे कसेबसे पोट भरीत आहे. तरी का तुम्हांला याची जाण? आयुष्यभर महात्माजी कष्टले, ते कशासाठी? आपल्या संसाराचा सारिपाट उधळून स्वातंत्र्यवीर झिजले ते कशासाठी? आपल्या साऱ्या वैभवाचा त्याग करून पंडितजींनी कारावासातील कष्टप्रद जीवन पत्करले, ते कशासाठी? माझ्यासाठीच ना?

आजचे माझे पुत्र-पुत्र कसले कुपूत्र. तुम्ही माझा-स्वतंत्रतेचा लिलाव करायलाच उदयुक्त झाला आहात का? प्रत्यक्ष आपल्या मातेची अशी विटंबना करणारे साऱ्या पृथ्वीवर कूणी नसतील. नाहीतर मूठभर पैशासाठी आपल्या देशाची रहस्ये विकायला माझेच हे सुज्ञ पुत्र कसे तयार झाले असते? कुणीतरी भडकविले म्हणून माझेच तुकडे करायला हे माझे दिवटे पुत्र कसे तयार झाले असते?

स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींचा सदैव जप करणारे तुम्ही दुसऱ्याला गुलामीत कसे ठेवता? घरातील स्त्रीला तुम्ही स्वातंत्र्य देत नाही. कुणाला तरी आपला ऋणको समजून त्याला पिढ्यान्पिढयाचा गुलाम करता, कूणाला तरी जन्माने दलित मानून त्याला बंधनात टाकता, स्वतःची हौस म्हणून स्वच्छंदी पक्ष्यांना, माशांना पिंजऱ्यांत टाकता. हे कसे? हीच माझी तुमच्याविरुद्ध कैफियत आहे.