श्रमांचे मोल 
The Value of Labor

बरीच वर्षे गेली तरी प्राथमिक शाळेतील एक पाठ मनःपटलावरून अजून पुसला गेला नाही. त्या पाठाचे नाव होते 'दिनूचे बिल.' दिनू नावाच्या एका मुलाने आपल्या आईला एक बिल सादर केले. घरात जी काही किरकोळ कामे तो करीत असे, त्या कामांचे ते बिल होते. त्याच्या प्रेमळ आईने त्या बिलाचे पैसे तर चकते केलेच; पण त्याबरोबर एक आपले बिलही दिनला दिले. या बिलात आईने आजवर दिनूसाठी ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या, त्यांतील काहींची नोंद केलेली होती आणि त्यापुढे त्यांची किंमत लिहिली होती-“काही नाही."

ही छोटीशी गोष्ट केवढी बोलकी आहे! कारण कित्येक परिश्रम असे असतात की, त्यांचे मोल आपण करू शकतच नाही. उन्हापावसात शेतात राबणारा कृषीवल सर्वांच्या क्षुधेसाठी चवदार, सकस धान्य निर्माण करतो. त्याच्या श्रमांचे मोल पैशात होऊ शकेल का? तो आपला 'अन्नदाता' आहे. महात्माजी त्याचा उल्लेख ‘लक्ष्मीनारायण' असाच करीत. दिवसरात्र कारखान्यात राबणारा मजूर समाजासाठी विविध वस्तूंचे उत्पादन करीत असतो. कापडगिरणीतील यंत्रे फिरलीच नाहीत तर वस्त्राची मूलभूत गरज कशी भागणार? कष्ट करणाऱ्या श्रमिकांच्या व्यथा आपण पुस्तकांत वाचतो. पण त्यांच्या श्रमांचे खरे मोल आपण जाणतो का?

श्रमिकांचा गौरव करताना कवी मढेकर या श्रमणाऱ्या श्रमिकाला 'नव्या युगातील गिरिधर पुतळा' म्हणतात.  वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या, बोचणारी थंडी व जाळणारे ऊन सोसून देशाची सीमा सांभाळणाऱ्या जवानांच्या श्रमांचे मोल कोणत्या नाण्यात करता येईल? त्यांच्या श्रमांचे मोल लालबहादूरांना जाणविले म्हणनच त्यांनी 'जय जवान, जय किसान' या घोषणेने त्यांचा जयजयकार केला.


एक काळ असा होता की, जेव्हा समाजातील श्रमिकांना कमी लेखले जाई; पण ती परिस्थिती आता बदलली आहे. कारण जगाने आज ओळखले आहे की, 'श्रमलक्ष्मी ही देवी उदयाची! ' आजचा नेता आजच्या युगाचा मंत्र सांगताना म्हणतो, “मज नकोत अश्रु घाम हवा!" कारण या नेत्याने जाणले आहे 'जिथे राबती हात तेथे हरी!' साऱ्या कष्टकऱ्यांच्या श्रमांचे मोल खरेच करायचे असेल तर त्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे त्यांचा 'श्रमाचा वसा' आपणही उचलायचा.